
महान्यूज ऑनलाईन
मुख्य पान | आपलं शहर | आपली बातमी | नोकरीविषयक | छोटी जाहिरात | संपर्क
Monday, 8 June 2026
शहरातील प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणेमुळे अपघातांचे प्रमाण घटणार – दादाजी भुसे


मालेगाव : शहरातील मोसमपुलावरील प्रमुख चौकात उभारण्यात आलेल्या सिग्नल यंत्रणेमुळे शहरातील अपघातांचे प्रमाण कमी होवून वाहतुक व्यवस्था सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल असा विश्वास राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याणमंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केला. नगरसेवक ॲड.गिरीश बोरसे यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या मोसमपूल चौकातील वाहतुक सिग्नलच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते.
मोसमपूल चौकातील सिग्नल यंत्रणा ही शहराच्या वैभवात भर टाकणारी असल्याचे सांगत मंत्री भुसे म्हणाले, शहरात नव्यानेच राबविण्यात येणाऱ्या यंत्रणेमुळे वाहतुक व्यवस्थेवर सुरवातीला ताण पडेल. येणाऱ्या अनुभवातून यामध्ये आवश्यक त्या सुधारणा देखील करण्यात येतील. यामुळे वाहतुकीला चांगली शिस्त लागेल. सिग्नल यंत्रणेमुळे वाहतुक पोलीसांबरोबर नागरिकांवर देखील मोठी जबाबदारी राहणार आहे. शहरातील या प्रमुख चौकातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी पर्यायी रिंग रोड प्रस्तावित करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तर रस्त्याच्या मधोमध असलेले विजेचे खांब व ट्रान्सफार्मर लवकरच स्थलांतरीत करून चौकाचे सुशोभिकरणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील असेही मंत्री भुसे यावेळी म्हणाले.
यावेळी उपमहापौर निलेश आहेर, जिल्हा पोलीस अधिक्षक (ग्रामीण) सचिन पाटील, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे आयुक्त दिपक कासार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शान-ए-हिंद निहाल अहमद, माजी महापौर हाजी मोहम्मद युनूस इसा, सखाराम घोडके, मुस्तकीम डिग्नीटी, भिमा भडांगे, नंदकुमार सावंत, एजाज बेग, शफीक अन्सारी, दिपाली वारूळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








