top of page

.... त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार

राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून ऑनलाइन पद्धतीने सुरु असलेल्या परीक्षा यावेळी ऑफलाइन होत आहेत. मात्र राज्यात काही ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे प्रकार घडत आहेत. कोरोनामुळे सध्या शाळा तिथे केंद्र सुरु केलं असताना कॉपीचे प्रकार आढळून येत आहेत. यामुळे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे.

परीक्षेदरम्यान पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास त्या शाळांची मान्यता काढून घेतली जाणार आहे. तसंच कॉपीचे प्रकार आढळले तर यापुढे त्या शाळांना परीक्षा केंद्र दिलं जाणार नाही अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत बोलताना दिली आहे.

१५ मार्च रोजी इ. १० वी मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण, येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले. सदर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल, असं वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.


 
 
 

Comments


bottom of page