top of page

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय…

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशामधील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत केंद्र सरकारने सोमवारी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये सचिव स्तराखालील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा आदेश ही जारी करण्यात आला आहे. ५० टक्के कर्मचारी कार्यालयातून तर ५० टक्के घरुनच काम करतील अशा पद्धतीचं नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सचिव आणि त्यावरील सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये उपस्थित राहणं बंधनकारक असणार आहे. नवीन आदेशानुसार अपंग व्यक्ती आणि गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे. हे कर्मचारी घरुन काम करु शकतात असं सांगण्यात आलं आहे. कामाच्या वेळा आणि मनुष्यबळ याची योग्य सांगड घालण्यात यावी असंही आदेशात म्हटलंय.

दीड वर्षांनंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये पुन्हा एकदा बायोमेट्रीक अटेंडन्स सुरु करण्यात आली होती. मात्र करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि संसर्गाची शक्यता लक्षात घेता सोमवार सायंकाळपासून पुन्हा एकदा अशी हजेरी लावण्याची यंत्रणा केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमध्ये सध्या वापरु नये असं सांगण्यात आलंय. दरम्यान, देशात १७०० ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून यामधील सर्वाधिक महाराष्ट्रात असून ५१० रुग्ण आढळले आहेत.


 
 
 

Comments


bottom of page