top of page

गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय ...

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र .... गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले गंभीर आरोप.... गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन... गृहमंत्र्यांची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी झाली पाहिजे अशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील केली मागणी ... राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका केली स्पष्ट... यासर्व घडामोडीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

ree

सरकारचे कसे आहे... आम्ही भ्रष्टाचार करू, दुराचार करू, अनाचार करू. 
फक्त विरोधक बोलले की, राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू. 
आता अशा वाक्यांची आता आम्हाला सवय. त्याने फार काही फरक पडत नाही 
                                              - देवेंद्र फडणवीस 

शरद पवारांची पत्रकारपरिषद मी पाहिली, ते म्हणाले की परमबीर सिंग यांची बदली होत असल्याने त्यांनी हा आरोप लावला. पण सुबोध जैस्वाल यांची तर बदली नव्हती, रश्मी शुक्ला यांची बदली नव्हती त्यांनी पुराव्याच्या आधारावर या सरकारकडे जो रिपोर्ट सादर केला होता. त्याचवेळी या संदर्भातील कारवाई झाली असती, तर मला असं वाटतं की आज ही वेळ या ठिकाणी आली नसती. असे फडणवीस म्हणाले,


आज शरद पवार यांची पत्रकारपरिषद ऐकल्यानंतर मला थोडं आश्चर्य देखील वाटलं, पण मी त्यांना दोष देणार नाही. या सरकारचे निर्माते ते आहेत, त्यामुळे निर्मात्यांना आपलं सरकार कसंही वागलं तरी त्याला वाचवण्याची भूमिका घ्यावी लागत असते. त्यांनी ज्यावेळी हे सांगितलं की वाझे यांना परमबीर सिंग यांनी घेतलं, हे खरंच आहे. परमवीर सिंग यांच्याच कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले. पण, मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला शरद पवार विसरले. त्यानंतर त्यांना सगळ्यात महत्वाची जागा देण्यात आली. तेव्हा काय सरकार झोपलं होतं का? सरकारला माहिती नव्हतं? सरकारला, मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना नियम माहिती नाही का? एखादा निलंबीत असलेला व्यक्ती जर तुम्ही काही कारणास्तव परत घेतला, तर त्याला महत्वाचं अधिकारी पद देता येत नाही, हे सरकारला माहिती नाही? एवढं नाही, तर सगळ्या महत्वाच्या केसेस, या त्यांच्याकडेच देण्यात आल्या, हे सरकारच्या आशीर्वादाशिवाय झालं का? असा सवाल करत फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला.


मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी काल एक पत्र लिहिले आहे. पण, अशाप्रकारचे हे पहिले पत्र नाही. यापूर्वी तत्कालिन पोलिस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी देखील या संदर्भातील रिपोर्ट हा राज्य सरकार व मुख्यमंत्र्यांना सादर केलेला आहे.” अशी माहितीही यावेळी फडणवीस यांनी दिली.


तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला होता आणि त्याच्यावर कुठलीही पुढची कारवाई झाली नाही. सुबोध जयस्वाल यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी पोलिस महासंचालकसारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे कारणच हे होते, कारण भ्रष्टाचाराबाबत शासन गंभीर नव्हते. गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय, याची चौकशी होऊच शकत नाही. गृहखाते कोण चालविते? अनिल देशमुख की अनिल परब? कारण, सभागृहात गृहविभागावर उत्तरं सभागृहात अनिल परब देतात. या नियुक्त्यांमध्ये नेमका हस्तक्षेप कुणाचा, हे स्पष्ट झालेच पाहिजे. असे ही फडणवीस म्हणाले.


ज्युलिओ रिबेरो हे अनुभवी आणि अतिशय चांगली व्यक्ती आहेत. ते केवळ परमवीरसिंग यांचीच चौकशी करणार की गृहमंत्र्यांची सुद्धा? थोडक्यात विद्यमान गृहमंत्र्यांची चौकशी 15-20 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या पोलिस अधिकार्‍यांनी करावी, असे शरद पवार यांना सूचवायचे आहे का ? असा सवालही फडणवीस यांनी केला.

Comments


bottom of page