top of page

बिहारमध्ये वीज पडून ३३ जणांचा मृत्यू

शुक्रवारी बिहारमधील अनेक भागांमध्ये अचानक मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडला. या वादळी पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळी पाऊस आणि वीज पडून १६ जिल्ह्यांमधील ३३ जणांचा मृत्यू झालाय. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. बिहारमधील या आस्मानी संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेद व्यक्त करतानाच, मदतीचं आश्वासन दिलं आहे.

ree


बिहारमधील भागलपूर परिसराला वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय. या ठिकाणी वीज पडून सात जणांचा मृत्यू झालाय. तर मुजफ्फरपूरमध्ये सहा लोकांचा मृत्यू वीज पडल्याने झालाय. दरम्यान मुसळधार पावसानंतर बिहारमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वातावरणातील बदलांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला अधिक सतर्कता बाळगण्याचं आवाहन नीतीश कुमार यांनी केलंय. बदलेल्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून वारंवार देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे आणि घरातच सुरक्षित रहावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी या घटनेसंदर्भात दु:ख व्यक्त करताना मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून चार लाखांची मदत केली जाणार असल्याचं सांगितलं. . नीतीश कुमार यांनी आपल्या ट्विटमध्ये, राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज पडून ३३ जणांचा मृत्यू झालाय, असं म्हटलंय. मृतांच्या नातेवाईकांना तातडीने ही मदत मिळावी यासाठी वेगाने पंचनामे करुन ही मदत लवकरात लवकर पोहचवली जावी यासंदर्भातील निर्देश देण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन या घटनेसंदर्भात खेद व्यक्त करताना बिहारमधील या घटनांमुळे फार दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. बिहारमधील वादळी पावसामुळे आणि वीज पडून मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करताना घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केलाय. मोदींनी देव मृतांच्या नातेवाईकांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो, अशी प्रार्थनाही मोदींनी केलीय.




 
 
 

Comments


bottom of page